नालेसफाईचे पितळ उघडे   

पिंपरी : बांधकामांसाठी वळविण्यात आलेले नाल्यांचे प्रवाह, त्यामुळे भुयारी नाल्यांवर आलेला ताण, माती वाहून आल्याने बुजलेले नाले, मेट्रोच्या कामाचा राडारोडा या कारणांमुळेच पावसाळ्यात हिंजवडीत मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याचे पाहणीत समोर आले. गेल्या कित्येक वर्षांत या भागात नालेसफाईच झाली नसल्याचेच पाहणीत दिसून आल्याचे आयटी कर्मचार्‍यांनी सांगितले. 
 
याशिवाय हिंजवडीतील शहरीकरणासाठी नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह वळविण्यात आला आहे. काही ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने नाले बुजविण्यात आले आहेत, तर काही भुयारी नाल्यांमध्ये वाहून आलेली माती साचल्याने हे नाले बुजले आहेत, अशी माहिती आयटी कर्मचार्‍यांनी दिली. त्यामुळे हिंजवडीत पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी हे एका नाही, तर विविध प्रशासकीय संस्थांचे अपयश असल्याचा आरोपही आयटी कर्मचारी व नागरिकांनी केला आहे.
यासंदर्भात फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजचे अध्यक्ष पवनजीत माने म्हणाले, केवळ १५ दिवसांतच दोन वेळा हिंजवडीत पावसाचे पाणी साचल्याने आयटीयन्सची गैरसोय झाली. वर्षानुवर्षे न झालेली नालेसफाई, नाल्यांवर झालेले अतिक्रमण हेच याला कारणीभूत आहेत. शनिवारी झालेल्या पावसात हिंजवडीतील फेज २ मध्ये पाणी साठले होते. मात्र, ही परिस्थिती १५ दिवसांपूर्वी हिंजवडी फेज ३ मध्ये होती. त्यामुळे हे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे. नालेसफाई तर झालीच पाहिजे. मात्र, ती न करणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे. 
 

Related Articles